चाळीशीतील गर्भधारणा मुदतपूर्व जन्माचा धोका वाढवू शकते

गर्भधारणेतील गुंतागुंतीबरोबरच उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया, गर्भरपणातील मधुमेह, बाळामध्ये गुणसूत्रातील विकृती, मुदतपूर्व जन्माचा धोका वाढत असल्याचा तज्ज्ञांचा इशारा आहे. सध्या अनेक मुली करिअरमुळे उशीरा लग्न आणि गर्भधारणेची उशीरा योजना आखत असल्याने वय वाढत जातं. बऱ्याचदा महिला 40 व्या वयानंतर गर्भधारणेचा निर्णय घेतात. अशावेळी मुदतपूर्व प्रसूती होण्याचा धोका अधिक असतो. गर्भधारणेच्या 37 व्या आठवड्यापूर्वी जन्मल्यास बाळास प्रीमॅच्युअर म्हटले जाते. वेळेआधी जन्माला (Premature Baby) आल्याने बाळाचा मृत्यू ही होऊ शकतो. अशात नवजात बाळाच्या आरोग्याची (Baby Health Care) काळजी घेणं खूप गरजेचं असते, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगत आहेत. 

40 व्या वर्षीही गर्भधारणेचे नियोजन

World Prematurity Day – 17th November

‘‘सध्या करिअरच्या किंवा काही वैद्यकीय परिस्थितींमुळे स्त्रिया उशिरा लग्न करतात. बहुसंख्य स्त्रिया पस्तीशीनंतर आणि वयाच्या 40 व्या वर्षीही गर्भधारणेचे नियोजन करतात. आता एआरटीच्या मदतीने, महिलांना इच्छित वयात मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करणे शक्य आहे. परंतु उशीरा गर्भधारणेमुळे मुदतपूर्व जन्म होऊ शकतो”, अशी प्रतिक्रिया अपोलो स्पेक्ट्रा मुंबईच्या स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ डॉ. डिंपल चुडगर यांनी व्यक्त केली आहे.

 डॉ. डिंपल पुढे म्हणाल्या,  ‘‘40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांच्या गर्भधारणेतील गुंतागुंतीमध्ये उच्च रक्तदाब, प्रीक्लेम्पसिया, गर्भधारणेतील मधुमेह, बाळामध्ये गुणसूत्रातील विकृती, मुदतपूर्व जन्म यांचा समावेश होतो. अशा बाळांना जन्मानंतर दीर्घ कालावधीसाठी अतिरिक्त काळजी आणि उपचारांची आवश्यकता असते. अकाली जन्मलेल्या नवजात अर्भकाची कोणतीही गुंतागुंत नवजात अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये हाताळली जाईल. अकाली जन्मलेली बाळे आपल्या जगात जीवनाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज नसतात. त्यांच्या लहान शरीरात अजूनही अविकसित भाग आहेत ज्यात फुफ्फुसे, पचनसंस्था, रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा यांचा समावेश होतो.”

जागतिक प्रीमॅच्युरिटी दिवस (World Prematurity Day – 17th November)

डोंबिवली येथील एसआरव्ही ममता रूग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अमेय कार्किडे म्हणाले की, ‘‘अकाली जन्मलेल्या बाळांना श्वसनाचा त्रास, कावीळ, अशक्तपणा, कमी प्रतिकारशक्ती, न्यूरोलॉजिकल विकार, श्रवणशक्ती कमी होणे, हृदयाच्या समस्या आणि कमकुवत स्नायू आदी समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यांची योग्य देखभाल आणि काळजी घेणे आवश्यक आहे फक्त एनआयसीयुमध्ये काळजी घ्यावी लागत नाही तर तर घरी सोडल्यानंतर देखील तितकीच देखभालीची आवश्यकता भासते. अकाली जन्मलेल्या बाळाला घरी घेऊन जाताना मातांनी डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले पाहिजे. बाळाला ऍलर्जी, इन्फेक्शन आणि विविध रोगांपासून दूर ठेवण्यासाठी आणि बाळाच्या विकासासाठी स्तनपान आवश्यक आहे. स्तनपानाबाबतचे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी आणि स्तनपानाचे योग्य तंत्र जाणून घेण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणं आवश्यक आहे. ”  

डॉ. अमेय पुढे म्हणाले की, ‘‘कांगारू केअर तंत्र देखील बाळासाठी महत्वाचे ठरते. यामुळे बाळाच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचे देखील नियमन होते. नवजात बाळाचे तापमान नियमित तपासा आणि कोणतेही संक्रमण टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्या. नियमित आरोग्य तपासणी आणि फॉलोअपमुळे बाळांना प्रौढावस्थेत निरोगी जीवन जगता येते. आज, वैद्यकीय विज्ञानातील अत्याधुनिक प्रगतीमुळे, अकाली जन्मलेल्या अर्भकांवर परिणाम करणाऱ्या अनेक परिस्थिती कौशल्याने हाताळले जाऊ शकते.”

तर खारघर येथील मदरहुड रूग्णालयातील सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ म्हणाल्या की, ‘‘ज्या मातांचे वय ३५ पेक्षा जास्त आहे त्यांना अकाली बाळ होण्याची शक्यता असते. पण प्रत्येक प्रकरणांमध्ये असं होत नाही. शिवाय, उशीरा गर्भधारणा करणाऱ्या महिलांना गर्भधारणा होण्यापूर्वी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि थायरॉईड समस्या यासारख्या आरोग्य समस्या असू शकतात. अकाली जन्मलेल्या बाळांना श्वासोच्छवासाचा त्रास, कमी प्रतिकारशक्ती आणि न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर यासारख्या आरोग्याच्या अनेक समस्या असू शकतात. अशा नवजात बाळांची एनआयसीयूमध्ये योग्यपद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे.”

Leave a Comment